Anish Gadhave: आम्ही गद्दारांना अंगावर नाही, तर शिंगावर घेतो. ठाणेकरांनो, आम्ही पैशाने गरीब असलो तरी तत्त्वाने श्रीमंत आहोत, आम्हाला कोणीही विकत घेऊ शकत नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाण्यात आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
नरेश म्हस्केंना सडेतोड इशारा
ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचे नाव न घेता गाढवे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. "आमचा एकही भोपळा फुटणार नाही, असे म्हणणारे तुम्ही कोण? जर ठाकरे सैनिकांनी ठरवले, तर ते भल्याभल्यांचे भोपळे फोडल्याशिवाय राहत नाहीत," असा इशारा त्यांनी यावेळी दिला. ठाण्यात सध्या जे काही राजकारण सुरू आहे, ते बदलण्याची गरज असून पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हा बदल आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - Raj Thackeray PC: "मुख्यमंत्र्यांना सगळं समजतंय, पण ..." राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हतबलतेवर उभे केले प्रश्नचिन्ह
'ठाणेकरांनो, सोन्याचा नांगर फिरवण्याची वेळ आली'
ठाण्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना गाढवे म्हणाले की, "या शहरात सध्या गाढवांचा नांगर फिरवण्यात आला आहे, पण आता वेळ आली आहे की ठाण्यात पुन्हा सोन्याचा नांगर फिरवला पाहिजे." ठाणे हे शिवसेनेचा बालेकिल्ला असून मतदारांनी परिवर्तनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - Municipal Elections: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकारण पेटलं! कुठे कार्यकर्त्यांची मारामारी, तर कुठे पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडीओंमुळे वातावरण तापलं
'महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो'
व्यासपीठावरील उमेदवारांचा उल्लेख करत गाढवे यांनी कार्यकर्त्यांना साद घातली. तसेच ठाकरे बंधूंचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की, या दोन वाघांच्या बाजूने असे भक्कम उभे राहा की, महाराष्ट्रात फक्त आणि फक्त 'ठाकरे ब्रँड' चालतो, हे दिल्लीपर्यंत समजले पाहिजे. या सभेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ठाकरे गटाने शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात थेट आव्हान दिल्याचे चित्र दिसत आहे.