मुंबई: राज्यात सध्या हवामानात प्रचंड चढ-उतार पहायला मिळत असून एकीकडे मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे नाशिक, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा जोर अधिक जाणवू लागला आहे. हवामान खात्याने कोल्हापूर, नागपूर, बीड, परभणी, वर्धा, सातारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. विजांचा कडकडाट, ढगाळ वातावरण आणि हलक्याफुलक्या सरी यामुळे या भागात हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यात तापमानाचा पारा चढत चालला आहे. नंदुरबारमध्ये 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, मुंबईतही उष्णता वाढत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसारख्या भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेले अंदाज पाहता, नागरिकांनी विशेषतः दुपारच्या वेळेस घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असले तरी उत्तर विदर्भात हवेचा दाब अजूनही कमी आहे, त्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. दरम्यान, पुणे, लातूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि नांदेड या भागांमध्ये देखील हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा हा बदल शेतीसाठी फायदेशीर ठरू शकतो, पण अचानक वादळ आणि विजेच्या गडगडाटामुळे नुकसान होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
बुलढाण्यात उष्माघातामुळे पहिला बळी
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात उष्माघातामुळे एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 11 वर्षीय संस्कार सोनटक्के याला उन्हाचा जोर सहन न झाल्याने त्याची तब्येत बिघडली आणि उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. हा हंगामातील राज्यातील पहिला उष्माघाताचा बळी ठरला आहे. यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता पसरली असून, अशा वेळी उष्माघातापासून बचावासाठी आवश्यकती खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.