पुणे: शहरातील तापमान 45 अंश सेल्सिअस ते थेट 55अंश सेल्सिअसपर्यंत जाणार असल्याचा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरतो आहे.'सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये' असा इशारा त्यामध्ये देण्यात आला असून, हवामान खात्याने हे तापमान सांगितल्याचा उल्लेख आहे. मात्र या मेसेजबाबत आता हवामान विभागाने अधिकृतरित्या खुलासा केला आहे. हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी स्पष्ट केलं की, आमच्याकडून अशा स्वरूपाची कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. एक महिना आधी तापमानाचा अचूक अंदाज सांगणं वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
सध्या पुणे आणि परिसरात तापमान 38 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. नुकत्याच लोहगाव येथे 42.6अंश तापमानाची नोंद झाली, जे त्या दिवशी राज्यातलं सर्वाधिक तापमान होतं. मात्र विदर्भात विजांच्या गडगडाटात पाऊस झाल्याने तिथे तापमानात घसरण झाली आहे. अशा प्रकारचं हवामान काही दिवसांत पुण्यातही निर्माण होण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत स्त्रोतांकडून खात्री करूनच माहिती घेण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे.
राज्याच्या विविध भागांमध्ये तापमान 40 अंशाच्या वर पोहोचल्याचे चित्र आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा आणि सोलापूरसह मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांत चाळिशी पार झालेलं तापमान दिसत आहे. धाराशिव, परभणी, बीड आणि संभाजीनगरमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींमुळे तापमानात किंचित घट झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत परभणी आणि हिंगोलीच्या काही भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.