Saturday, February 14, 2026 12:53:51 PM

Ajit Pawar Statement About Pilot: 'वैमानिकाचा निरोप आला की जावं लागतं…'; अजितदादांच्या 'त्या' शब्दांनी आज काळजाचा ठोका चुकला, जुना व्हिडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे हे विधान वाऱ्यासारखे व्हायरल होत असून, ते ऐकून समर्थकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत.

ajit pawar statement about pilot वैमानिकाचा निरोप आला की जावं लागतं… अजितदादांच्या त्या शब्दांनी आज काळजाचा ठोका चुकला जुना व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Statement About Pilot: "वैमानिकाचा निरोप आला की मला निघावं लागतं..." अवघ्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी अतिशय घाईत असताना उच्चारलेले हे शब्द आज इतक्या भीषण सत्यात बदलतील, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सोशल मीडियावर त्यांचे हे विधान वाऱ्यासारखे व्हायरल होत असून, ते ऐकून समर्थकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. नियतीचा हा खेळ किती क्रूर असू शकतो, याचा प्रत्यय या व्हिडिओमुळे महाराष्ट्राला येत आहे.

काय होते ते व्हायरल विधान?
दरम्यान, 9 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यानचा हा प्रसंग आहे. एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना अजित पवार यांनी मिश्किलपणे पण स्पष्ट शब्दात सांगितले होते की, “वैमानिकाचा निरोप आला किंवा उशीर झाला तर मला तातडीने निघावे लागते.” त्यावेळी त्यांनी हे विधान प्रवासाच्या घाईमुळे आणि वेळेच्या नियोजनासाठी केले होते, मात्र आज विमान अपघातातच त्यांचा अंत झाल्याने या वाक्याने अनेकांचे हृदय पिळवटून निघत आहे.

नियतीचा अजब आणि क्रूर खेळ
नेहमी वेळेचे भान राखणारे आणि शिस्तीसाठी ओळखले जाणारे अजितदादा 'वैमानिकाच्या निरोपा'बद्दल इतके गांभीर्याने बोलत असत. मात्र, आज बारामतीच्या धावपट्टीवर नियतीने असा काही खेळ मांडला की, वैमानिकाचा तो निरोप त्यांच्या आयुष्याचा शेवटचा निरोप ठरला. त्यांच्या या विधानाची क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात असून, "दादांनी हे काय बोलून ठेवले होते?" अशा शब्दांत चाहते आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

असा होता दादांचा शेवटचा प्रवास
अजित पवार हे VSR कंपनीच्या खासगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. या प्रवासाचा तपशील आता अधिकृतपणे समोर आला आहे. विमानाने मुंबईहून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी उड्डाण (Takeoff) केले होते आणि बारामतीमध्ये सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी त्याचे लँडिंग अपेक्षित होते. मात्र, त्या 40 मिनिटांच्या प्रवासातच काळाने घाला घातला.

हेही वाचा - Raj Thackeray Tweet: 'ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकारणात …' ; अजित पवारांबाबत राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

विमानातील सहकारी आणि दुःखद अंत
या दुर्दैवी दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीएसओ विदीप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला आहे. राजकारणातील एक बेधडक, स्पष्टवक्ता आणि रोखठोक व्यक्तिमत्व आज अशा प्रकारे शांत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक झंझावाती पर्व कायमचे संपले आहे.  
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या