Uddhav Thackeray On Retirement : 'द एन्काउंटर विथ वृषाली कदम' या विशेष मुलाखतीत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय निवृत्तीबाबतचे आपले संकेत देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिवतीर्थावरील संयुक्त सभेत आदित्य ठाकरे यांच्या प्रभावी भाषणानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी 'उद्धवजी, आता तुम्ही विश्रांती घेतली तरी चालेल' असे विधान केले होते. याचा संदर्भ देताना ठाकरे म्हणाले की, 'हो, मला खरोखरच निवृत्त व्हायचे आहे. मी माझे संपूर्ण आयुष्य राजकारणात व्यतीत केले असून, केवळ माझ्या वडिलांच्या इच्छेखातर मी या क्षेत्रात आलो होतो.' आदित्य ठाकरे आता समर्थपणे नेतृत्व करण्यास सज्ज झाल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवले.
कोणीही माय-बाप उरला नाही
राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी लोकशाहीचा खून झाला आहे अशी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली. आगामी काळात राजकीय समीकरणे वेगाने बदलतील, असा दावा करताना त्यांनी "2029 पर्यंत महायुतीचे अस्तित्व टिकणार नाही" असे भाकीत केले. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मेट्रोचे मार्ग वाढले, याला तुम्ही त्यांचे 'व्हिजन' मानता का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे व्हिजन नसून नियोजनशून्य विकास असल्याचे म्हटले. मुंबईतील सध्याच्या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात शहराचा पूर्णपणे चुथडा झाला असून, प्रचंड वाहतूक कोंडी आणि पाण्याच्या गंभीर समस्यांमुळे मुंबईकरांना कोणीही माय-बाप उरला नसल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा - Prakash Ambedkar : 'संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी..' भाजपवर कडाडून टीका करत प्रकाश आंबेडकरांचा एल्गार
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी वचनामा तयार केला
या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीचा एक नवा पैलू समोर आला. आगामी निवडणुकांसाठीचा संपूर्ण वचननामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांनी मिळून तयार केला असून, त्यामध्ये आपण किंवा राज ठाकरेंनी हस्तक्षेप केलेला नाही, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Gunaratna Sadavarte : 'निवडणुका आल्या की, दोन बेडूक डराव डराव करतात...', गुणरत्न सदावर्तेंनी ओवैसी आणि राज ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, सत्ताधारी केवळ हिंदू-मुस्लिम वादावर बोलतात, पण आम्ही केलेल्या कामावर बोलतो. सभेला भाडोत्री माणसे आणली जातात आणि मुंबईतील महत्त्वाची कामे अदानींच्या घशात घातली जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पेंग्विनवरून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, आजही लोक रांगा लावून जिजामाता उद्यानात ते पाहायला जातात, पण सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांना काय दिले, असा प्रतिसवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.