नागपूर : विधानसभा निवणुकीचा निकाल लागल्यानंतर ईव्हीएम मशीनवर मोठ्या टीका केली जात आहे. यातच आता नागपूरमध्ये काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम बंद करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. महादूलु येथून बाईक रॅली काढत, कार्यकर्त्यांनी संविधान चौकात निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम प्रणाली बंद करण्याची मागणी केली.
सुनील केदार यांनी ईव्हीएम प्रणालीवर गंभीर आरोप केले, "ईव्हीएममध्ये टेम्परिंग होऊ शकते. इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही आणि त्यामध्ये फेरफार केल्या जाऊ शकतात." त्यांनी पुढे सांगितले की, "जगातील अनेक देशांनी ईव्हीएम प्रणाली नाकारली आहे, मग आपल्याला ती का वापरायची?"
केदार यांनी काँग्रेस आणि भाजपाच्या पूर्वीच्या भूमिकेवर भाष्य करत, "काँग्रेस सरकारच्या काळात भाजपाने ईव्हीएमला विरोध केला होता. त्यांनी या मुद्द्यावर पुस्तकही छापले होते. ते पुस्तक पुन्हा वाचा," असा सल्ला भाजपाला दिला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत, "कुठेतरी सुरुवात होणे गरजेचे आहे. एकदा सुरुवात झाली की ती सगळीकडे पसरते," असं केदार यांनी म्हटले आहे.