बीड : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आवादा पवनऊर्जा कंपनी चर्चेत आली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. अशातच बीडमध्ये आवादा कंपनीच्या कामगाराचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. बीडमधील देशमुख हत्या प्रकरणाशी आवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी यांचं कनेक्शन समोर आल्यानंतर त्यातील अधिक तपास सुरू आहे. अशामध्ये आवाद कंपनीत काम करणाऱ्या मजूराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे बीड प्रकरणातील चर्चांणा उधाण आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आवादा कंपनीतील कामगाराचा मृत्यू
बीडच्या केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबच्या मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पंजाब राज्यातील हा कामगार बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत काम करत होता. रचपाल हमीद मसीह असे या मजुराचे नाव असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज - अंबाजोगाई रोडवर असलेल्या बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.
हेही वाचा : मुंबईतील सैफ अली खानवर हल्ला, मुंबई पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
खंडणी प्रकरणात आवादा कंपनी चर्चेत
वाल्मिक कराड आणि त्याची टोळी खंडणी प्रकरणात चर्चेत आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितली होती. मात्र आवादा कंपनीने दोन कोटी देण्यास नकार दिल्याने कराडने कंपनीला बीडमधून गाशा गुंडाळायला लावण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आवादा कंपनीने तडजोड करण्याची तयारी दाखवली. खंडणी मागणाऱ्या मुलांना कंपनीच्या अधिकाऱ्याने ५० लाख दिल्याची माहिती बीडमधील भाजपा आमदार सुरेश धस यांनी वारंवार माध्यमांना दिली आहे. सरपंत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे मूळ आवादा कंपनीशी जोडले आहे. खंडणी आणि खून प्रकरण संलग्न असल्याने एसआयटी आणि सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहेत.