जालना: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अन्वा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या वादातून एका 36 वर्षीय व्यक्तीला तापलेल्या लोखंडी रॉडने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पीडित व्यक्तीचे नाव कैलास बोराडे असे असून, शेतीच्या वादातून त्याच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत नवनाथ दौंड आणि सोनू उर्फ भागवत दौंड या दोघांवर संशय असून, त्यांनीच कैलास बोराडे यांना निर्वस्त्र करून मारहाण केल्याचा आरोप आहे. पाय, पाठ, पोट आणि मान याठिकाणी गंभीर भाजल्यामुळे पीडिताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, कैलास बोराडे यांचा काही दिवसांपूर्वी नवनाथ दौंड यांच्यासोबत शेतीच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून नवनाथ दौंड यांनी त्यांच्या साथीदारासह त्यांना धडा शिकवण्याचा कट रचला. त्यांनी कैलास बोराडे यांना पकडून, चुलीमध्ये तापवलेला लोखंडी रॉड त्यांच्या शरीरावर दाबून गंभीर जखमी केले.
हेही वाचा: संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील मोठा पुरावा हाती; हालहाल करुन मारले
या घटनेनंतर कैलास बोराडे यांनी पारध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी फरार असल्याची शक्यता असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
या अमानुष घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या वादातून अशा प्रकारच्या क्रूर कृत्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासन कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.