जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत झालेल्या मृत्यूमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस सध्या जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर असून, तेथूनच त्यांनी या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त करत या घटनास्थळावर तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
दुर्घटनेनंतर तत्काळ मदत आणि बचाव कार्य
घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी त्वरित पोहोचून मदत व बचाव कार्याचे व्यवस्थापन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जारी केलेल्या दृकश्राव्य संदेशात ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या वेदनांबाबत सहवेदना व्यक्त करत जखमींच्या उपचारांसाठी तातडीने व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
आपत्कालीन यंत्रणांची तत्परता
दुर्घटनास्थळी आठ रुग्णवाहिका तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालयांसोबतच नजीकच्या खाजगी रुग्णालयांनाही जखमींच्या उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स यांसारख्या आपत्कालीन यंत्रणाही तत्काळ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्याशी समन्वय साधून सर्व मदत तत्काळ पुरविण्यात येत असल्याचे सांगितले.
घटनेची दखल घेऊन आवश्यक ती मदत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्यातील ही दुर्घटना अतिशय वेदनादायी असून, मृतांच्या कुटुंबियांसाठी आमचे मनापासून शोक व्यक्त आहे. जखमींच्या तातडीच्या उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून, परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.”
घटनास्थळी बचाव कार्य चालू असून, प्रशासन पूर्णपणे कार्यरत आहे. सर्व जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा देण्यावर भर देण्यात येत आहे.
👉👉 हे देखील वाचा : जळगावात रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना
रेल्वे अपघातवर अमित शाहांचे ट्विट
महाराष्ट्रातील जळगाव येथे घडलेला रेल्वे अपघात अत्यंत दुःखद आहे. या संदर्भात मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. स्थानिक प्रशासन जखमींना शक्य ती सर्व मदत पोहोचविण्याचे काम करत आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी मी शोक व्यक्त करतो आणि जखमी व्यक्ती लवकर बऱ्या होवोत, अशी मनःपूर्वक प्रार्थना करतो.