पंतप्रधान नरेंद्र मोदींचा द्रमुक आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा द्रमुक आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. द्रमुक आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते महिलांचा सातत्याने अपमान करीत आहेत, तर महिलांचे सक्षमीकरण हे रालोआच्या योजनांचे उद्दिष्ट आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. जी. रामचंद्रन यांचा सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक भरभराटीचा दृष्टिकोन यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे,द्रमुक आणि काँग्रेस यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नाही, जनतेच्या सुरक्षेची, सन्मानाची ते हमी देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडेल’, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
‘मदुराई हे शांतताप्रिय शहर आहे, मात्र कौटुंबिक प्रश्नांमुळे द्रमुक त्याला माफियांचा अड्डा बनवू पाहात होते, मदुराई महिला सक्षमीकरणाची शिकवण देते’, असे सांगताना मोदी यांनी स्थानिक देवता मीनाक्षी अम्मनचा संदर्भदेखील दिला.
उज्ज्वला योजनेसह रालोआच्या अनेक योजनांचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण हा आहे. मात्र द्रमुक आणि काँग्रेसला ते समजत नाही, त्यांच्याकडून महिलांचा सातत्याने अपमानच केला जात आहे, असेही मोदी यांनी यावेळी म्हणाले.