मुंबई: मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणांपैकी एक म्हणून घाटकोपर ओळखले जाते. मात्र, या घाटकोपरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुजराती आणि मराठी या दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. खासकरून मराठी भाषकांवर होणारा अन्याय, अपमानास्पद वागणूक आणि सामाजिक बहिष्कार यामुळे घाटकोपरमध्ये चिंताजनक वातावरण तयार झाले आहे. सध्या घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, ज्यामध्ये घाटकोपर परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चार मराठी कुटुंबीयांवर त्यांच्या खानपानाच्या सवयींवरून अपमानास्पद टीका-टिप्पणी करण्यात आली आहे.
या सोसायटीमध्ये गुजराती, जैन आणि मारवाडी या रहिवाशांची संख्या जास्त आहे. मात्र, इथे राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांना त्यांच्या मांसाहारी जेवणामुळे नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 'तुम मराठी लोग गंदे हैं, तुम लोग मच्छी मटण खाते हो', असे आरोप करत शाह नावाच्या व्यक्तीकडून सतत आमचा अपमान होत असल्याचे तिथल्या मराठी रहिवाशांनी सांगितले. ही केवळ भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करणारी घटना नसून ती धार्मिक आणि सामाजिक दादागिरीचे हृदयद्रावक उदाहरण बनली आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये मराठी कुटुंबीयांना घर भाड्याने देणे किंवा घर खरेदी करण्यासाठी नाकारले जात असल्याच्या घटना सतत समोर येत आहेत. भाषेच्या आधारावर होणारी ही भेदभावाची वागणूक केवळ मराठी समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मुंबईसाठी धोक्याची घंटा आहे.
मराठी कुटुंबांना त्रास दिला तर 4 जणांसाठी 4000 लोक तयार होतील:
या घटनेची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते संबंधित सोसायटीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, 'इथून पुढे जर मराठी कुटुंबांना त्रास दिला गेला, तर 4 जणांसाठी 4000 लोक तयार असतील.' मनसेचे राजू पार्टे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट शेअर करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणले.
मनसेंची एंट्री होताच आरोपी लपून बसले:
मनसे कार्यकर्त्यांची सोसायटीमध्ये एंट्री होताच संबंधित आरोपी समोर न येता लपून बसले. यादरम्यान, इतर काही रहिवाशांनी वाद मिटवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, या प्रकाराचा तीव्र निषेध करत मनसैनिकांनी, 'मराठी समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही,' असा ठाम संदेश दिला.
या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मराठी समाजाला त्यांच्या खाद्यसंस्कृतीवरून किंवा भाषेवरून चुकीची वागणूक देण्याचा हा प्रकार स्वीकारण्यासारखा नाही. 'जर वेळीच राज्य सरकारने आणि पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर पावले उचलली नाहीत, तर मराठी अस्मितेचा हा लढा आणखी उग्र स्वरूप धारण करेल,' असा इशारा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.