नवी मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! बेलपाडा मेट्रो स्टेशनजवळ मोरबे मुख्य जलवाहिनीला झालेल्या पाणी गळतीच्या दुरुस्तीमुळे उद्या, मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 10 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
याचा परिणाम नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या भागांवर होणार असून, या परिसरातील नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. तसेच, सिडकोच्या कामोठे नोड भागातील पाणी पुरवठाही यामुळे बाधित होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, बुधवारी पाणी कमी दाबाने आणि अपुरे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा आणि आवश्यकतेनुसार पाणी वापरण्याची काळजी घ्यावी.
नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने नागरिकांना वेळेत पूर्वसूचना देत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभाग युद्धपातळीवर कार्यरत असून, नागरिकांनी संयम बाळगावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.