Rat Poison on Fruits: मुंबईच्या मालाड उपनगरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. उंदरांपासून फळांचे संरक्षण करण्याच्या नावाखाली फळांना थेट उंदरांचे विष लावणाऱ्या दोन फळ विक्रेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मालाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित दुकान सील केले आहे. फळांवर विषारी रसायने लावून ती ग्राहकांच्या जिवाशी खेळत विकली जात असल्याचा गंभीर आरोप या विक्रेत्यांवर आहे.
रेटिनॉल नावाचा विषारी पदार्थ लावून विक्री
मिळालेल्या माहितीनुसार, हे विक्रेते फळांवर 'रेटिनॉल' नावाचा घातक पदार्थ लावत होते. स्थानिक रहिवासी कुणाल साळुंके यांनी याप्रकरणी मालाड पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला. काही विक्रेते फळांना विषारी द्रव्य लावत असताना साळुंके यांनी ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. हा व्हिडीओ पुरावा म्हणून पोलिसांना सादर करण्यात आला, ज्यामध्ये दोन विक्रेते उंदरांपासून बचाव करण्यासाठी फळांना विष लावत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली
तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन मालाड पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीदरम्यान, आरोपींनी उंदरांपासून संरक्षण करण्यासाठी फळांना उंदरांचे विष लावल्याची कबुली दिली. ही पद्धत केवळ बेकायदेशीरच नाही, तर सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत प्राणघातक असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्नपदार्थांसोबत असा निष्काळजीपणा केल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकला असता, असेही पोलिसांनी नमूद केले.
हेही वाचा - Unique Railway Station : ना एन्ट्री गेट, ना तिकीट खिडकी, ना बाहेर जाण्याचा रस्ता! इथं जाण्या-येण्यासाठी वाहनही रेल्वेच! पण माणसं नेमकी जातात तरी कुठं?
भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल
याप्रकरणी पोलिसांनी मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 125, 274, 275 आणि 286 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात वापरलेला माल जप्त करण्यात आला असून दुकान सील करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अन्न सुरक्षा आणि मानके विभागालाही (FSSAI) या घटनेची माहिती दिली जाणार आहे.
https://youtu.be/ge6_xzYEllo?si=BlaFqRcj7S02aS9E