मुंबई: मुंबईकरांसाठी एक गंभीर इशारा समोर आला आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील साठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, वाढत्या उकाड्यामुळे आणि पाण्याच्या मागणीत वाढ झाल्यामुळे ही परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. विशेषतः मोडक सागर, तानसा आणि तुळशी या प्रमुख धरणांतील साठा वेगाने खाली जात आहे. मुंबई महापालिकेने याबाबत खबरदारी घेतली असली तरी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने भातसा आणि अप्पर वैतरणा धरणांतील राखीव पाणीसाठा वापरण्यास परवानगी दिली आहे, मात्र ही तात्पुरती सोय असल्याने दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहेत. जून-जुलैपर्यंत पुरेल इतकं पाणी उपलब्ध असलं तरी रोजच्या रोज पाणीसाठा कमी होत असल्याने धोका कायम आहे. महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे
मुंबईला दररोज जवळपास 3,900 दशलक्ष लिटर पाणी पुरवलं जातं, मात्र बाष्पीभवन, गळती, आणि अनावश्यक वापरामुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतो आहे. सातही धरणांची एकूण साठवण क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर असून, सध्या केवळ 3.88 लाख दशलक्ष लिटर पाणी उरलेलं आहे. मागील वर्षीच्या तुलनेत थोडासा साठा जास्त असला तरी हवामानातील बदल लक्षात घेता ही परिस्थिती डोळसपणे हाताळणं आवश्यक आहे. आता जाणीवपूर्वक एकेक थेंब वाचवणं ही मुंबईकरांची जबाबदारी आहे!