भिवंडी: राज्यभरात उष्णतेचा कहर वाढत असताना भिवंडीकरांवर एक नवीन संकट कोसळलं आहे. उन्हाळ्यात जिथे पाण्याची गरज अधिक असते, तिथेच आता भिवंडी शहरात पुढील 24 तास पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
भिवंडीला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम कंपनीच्या मुख्य जलवाहिनीला कल्याणजवळील सापड गावाच्या हद्दीत गळती लागल्याने ती वाहिनी तुटली असून त्यामुळे संपूर्ण भिवंडी शहराचा पाणीपुरवठा थांबवण्यात आला आहे.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी संपूर्ण 24 तास शहरातील नळांना पाणी येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि आवश्यक तेवढ्याच पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही घटना ऐन उन्हाळ्यात घडल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणावर नाराजीचे वातावरण आहे. शाळा, दवाखाने, लहान मुले, वयोवृद्ध अशा सर्वच घटकांना या पाणीबाणीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरात लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांनी काय करावे?
- पाणी जपून वापरा
- अनावश्यक वापर टाळा
- पाण्याचा साठा करून ठेवा
- प्रशासनाच्या सूचनांचे पालन