आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक-अपची धडक

कार्तिकी एकादशीला कोकणातून आळंदी यात्रेसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक-अप टेम्पो घुसल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २ वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून २०-२२ वारकरी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर साते गावच्या हद्दीत आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
खालापूर तालुक्यातील खालापूर, कर्जत, उंब्रे, खोपोली आदी भागातील वारकरी आळंदी यात्रेसाठी पालखी घेऊन पायी दिंडीने येत होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे भरधाव वेगाने जाणारा पीकअप टेम्पो या दिंडीत घुसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी आरोपी पिकअप टेम्पो चालकाला ताब्यात घेतले.
पुणे-मुंबई महामार्गावरील या अपघातात दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून १४ नागरिकांना कामशेत येथील महावीर रुग्णालयात तर काही वारकऱ्यांना बढे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.