Saturday, January 18, 2025 06:12:43 AM

Rahul Shewale
'बांगलादेशी घुसखोरांना तातडीने देशाबाहेर काढा'

देशाचे स्थैर्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तातडीने कारवाई करून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा अशी मागणी शिवसेनेचे माजी लोकसभा गटनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली आहे.

बांगलादेशी घुसखोरांना तातडीने देशाबाहेर काढा

मुंबई : देशाचे स्थैर्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी तातडीने कारवाई करून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा अशी मागणी शिवसेनेचे माजी लोकसभा गटनेते आणि माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. देशभरातील पोलिसांना यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती शेवाळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीच्या वाढत्या घटनांकडे लक्ष वेधण्यासाठी शेवाळे यांनी हे निवेदन दिले.

आपल्या निवेदनात माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पुण्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. पुण्यात जागा खरेदी करून स्वतःचे घर बनवणाऱ्या बांगलादेशी घुसखोराची माहिती निवेदनात विशद केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखोरीच्या वाढलेल्या घटना या दुर्दैवी असून भिवंडीसारख्या परिसरातून या घुसखोरांची शासकीय कागदपत्रे तयार केली जातात. या घुसखोरीमुळे देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका असून पायाभूत सुविधांवर देखील मोठा ताण पडत आहे. एकीकडे बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार सुरू असताना दुसरीकडे बांगलादेशी घुसखोरांची गंभीर समस्या भारतासमोर उभी ठाकली आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व पोलीस स्थानकांना विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे. या मोहिमेत अनधिकृत बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात आणि या घुसखोरांना शासकीय कागदपत्रे मिळवून देणाऱ्या संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करावी असे शेवाळे यांनी म्हटले आहे.

 

काय म्हणाले राहुल शेवाळे ?

"बांगलादेशी घुसखोरी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना माझ्या वतीने निवेदन सादर केले आहे. मला खात्री आहे की  या निवेदनाची दखल घेऊन या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाकडून योग्य त्या कारवाईला तातडीने सुरुवात केली जाईल. यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणाऱ्या बांगलादेशी घुसखोरीला आळा घालता येईल."


सम्बन्धित सामग्री