पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी येथील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अशातच, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतली तसेच त्यांना धीर दिला आहे. 'ज्यांनी तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल,' पंकजा मुंडेंनी कस्पटे कुटुंबियांना आश्वस्त केले.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी नोंदवले तीन साक्षीदारांचे जबाब; एक पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर जप्त
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
'आई-वडील आपल्या मुलीला एवढ्या लाडाने वाढवतात. त्यांना फार ऐश्वर्य मिळावं यासाठी त्यांचं पालनपोषण करतात. त्यांच्या विवाह करताना आई-वडील आपलं सर्वस्व पणाला लावतात, त्यांच्या संसाराला आई-वडील सतत हातभार लावत असतात. मात्र आपल्या मुलीचा प्राण अशा पद्धतीने गेला तर त्या आई-वडिलांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. मी राज्याची एक मंत्री आणि महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे. त्यांच्या मनात आता कोणतीही शंका राहणार नाही. त्यांच्या मुलीवर ज्यांनी अन्याय केला, अत्याचार केला, तसेच तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेतला, त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल, असा शब्द मी त्यांना दिला आहे,' असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर, पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शशांक हगवणे फरार असल्याचे सांगितले जात होते. सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरकडून लग्नासाठी 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, महिन्याला जावयाला सोन्याची अंगठी आणि वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला गेला होता. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी माहेरकडून पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीला छळ करण्यात आला. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.