मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच, राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यक्तव्य केले आहे, ज्यामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना 'राज' मंत्र दिला की, 'ठाकरेंसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य नको'.
सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. युतीबाबत उद्धव ठाकरेंचे नेते म्हणाले की, 'आम्ही सकारात्मक आहोत'. मात्र, या युतीवर राज ठाकरे आणि त्यांच्या नेत्यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच, 6 जून रोजी झालेल्या बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना युती करण्याची मागणी केली आहे. मात्र, यावर आता राज ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
'संदेश कशाला? मी बातमीच देईन' - उद्धव ठाकरे:
जेव्हा एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना, 'मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल?' असा प्रश्न विचारला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली, 'संदेश कशाला? मी तुम्हाला बातमीच देईन. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ'.
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी जोरदार चर्चा सुरू आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मनात जे आहे, तेच होणार'. सध्या महाराष्ट्राच्या मनात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे असेच आहे. 'भविष्यात हे दोन्ही ठाकरे एकत्र येणार का?' अशी जोरदार चर्चाही सुरू आहे आणि असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.