शिर्डीच्या साईबाबा संस्थेकडून मुख्यमंत्री निधीसाठी 10 कोटींचा निधी!

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे.
या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय.
ही परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. अनेक गावंही उद्ध्वस्त झालेली आहेत.
ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपलं राष्ट्रीय कर्तव्य समजून या पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने घेण्यात आलाय. हा निधी न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. संस्थानाच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक आणि औषधंही पाठवणार आहे.
राज्य शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतुन बाहेर पडण्यासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.