T20 World Cup 2026: यंदाच्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सुपर-8 फेरीतील सामने संपत आले असून, लवकरच सेमीफायनलचे (उपांत्य फेरी) चार संघ निश्चित होतील. क्रिकेट चाहत्यांमध्ये आता उपांत्य फेरीचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जातील, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.
सुपर-8 फेरीचा थरारक समारोप
या विश्वचषकातील सुपर-8 फेरीचे अंतिम सामने 1 मार्च 2026 रोजी खेळवले जातील. या दिवशी दोन महत्त्वाचे सामने होणार आहेत:
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे: दुपारी 1 वाजता, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली. (दक्षिण आफ्रिका आधीच पात्र ठरली असून झिम्बाब्वे स्पर्धेबाहेर आहे).
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: ईडन गार्डन्स, कोलकाता. हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून, यावरच भारताचे उपांत्य फेरीतील स्थान अवलंबून आहे.
पहिला उपांत्य सामना: ठिकाणाबाबत अद्याप पेच
विश्वचषकातील पहिली सेमीफायनल 4 मार्च 2026 रोजी खेळवली जाईल. या सामन्याचे ठिकाण पाकिस्तानच्या कामगिरीवर अवलंबून आहे. जर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर हा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाईल. मात्र, पाकिस्तानची सध्याची स्थिती पाहता त्यांचे आव्हान कठीण वाटते. जर पाकिस्तान पात्र ठरला नाही, तर हा पहिला उपांत्य सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर पार पडेल.
दुसरा उपांत्य सामना: मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची दावेदारी?
दुसरी सेमीफायनल 5 मार्च 2026 रोजी खेळवली जाईल. या सामन्यासाठी मुंबईचे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम निश्चित करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, जर भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला, तर भारताचा सामना याच मैदानावर खेळवला जाईल. घरच्या मैदानावर आणि चाहत्यांच्या पाठिंब्यावर टीम इंडिया अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज असेल.
हेही वाचा - Rinku Singh Father Passed Away : रिंकू सिंगच्या वडिलांचे दु:खद निधन, रूग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
वेळ आणि थेट प्रक्षेपण
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. सुपर-8 फेरी संपल्यानंतर खेळाडूंना दोन दिवसांची विश्रांती मिळेल आणि त्यानंतर 4 मार्चपासून बाद फेरीच्या लढतींना सुरुवात होईल.