मुंबई: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडूंनी खेळभावनेचा काळा दिवस दाखवला आहे. 2025 आशिया कपमध्ये आधीच पाकिस्तान खेळाडूंवर आयसीसीने कारवाई केली होती, त्यामुळे वागणुकीत बदल होईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, रविवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तान अ संघाने पुन्हा एकदा खेळाच्या प्रतिष्ठेला तडा देत भारतीय चाहत्यांचा संताप ओढवून घेतला आहे.
भारत-अ संघाचा उपकर्णधार नमन धीरला बाद केल्यानंतर पाकिस्तानी फिरकीपटू साद मसूदने मैदानात अक्षरशः उच्छाद मांडला. धीरने 20 चेंडूत 35 धावा करत जबरदस्त खेळी केली होती, मात्र त्याला बाद केल्यानंतर साद मसूदने अत्यंत उद्धट आणि आक्रमक शैलीत शिवीगाळ करत नमनला निघून जाण्याचा इशारा दिला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि काही क्षणांतच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. चाहत्यांनी या वर्तनावर जोरदार संताप व्यक्त केला असून “हा तर खेळभावनेविरुद्धचा स्टंट आहे” अशी टीका केली आहे. हे सर्व 8.4 व्या षटकादरम्यान, दोहा येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील सहाव्या सामन्यात घडले. साद मसूदचे वर्तन पाहूनही नमन धीरने कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे पॅव्हेलियनमध्ये परत जाण्याचा मोठेपणा दाखवला. परंतु भारतीय चाहत्यांच्या रोषाची लाट मात्र संपूर्ण सोशल मीडियावर उसळली.
हेही वाचा: Palghar BJP Politics: आधी आरोप मग पक्ष प्रवेश! पालघर साधू हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपात
सामन्याच्या खेळावर नजर टाकली तर, नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारत-अ संघाचा डाव फक्त 136 धावांवर गुंडाळला. वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूंमध्ये 45 धावा ठोकत दमदार सुरुवात दिली. नमन धीरनेही फटकेबाजी करत 35 धावा केल्या. परंतु इतर फलंदाज अपयशी ठरल्याने भारत मोठा डाव उभारू शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान-अ संघाने केवळ 2 गडी गमावत 137 धावा करत सामना जिंकला. अखेरीस मोहम्मद फैकने षटकार ठोकत विजय मोहर उमटवली. मात्र, फैकने त्यानंतर केलेल्या हावभावांमुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खेळाडूंवर नाराजीचा भडका उडाला आहे. विजयाच्या क्षणीही विनाकारण आक्रमक हावभाव करत त्याने भारतीय चाहत्यांमध्ये असंतोष अधिक वाढवला.
भारत-अ आणि पाकिस्तान-अ सामन्यातील खेळापेक्षा मैदानात घडलेल्या पकिस्तान खेळाडूंच्या अभद्र वर्तनामुळेच चर्चा रंगत आहे. क्रिकेट खेळ हा सज्जनांचा मानला जातो; परंतु पाकिस्तानच्या खेळाडूंच्या पुन:पुन्हा अशा वर्तनामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojna : eKYC करण्यासाठी लाडक्या बहिणींची धावाधाव! उरला फक्त एकच दिवस