मुबई: बॉर्डर - गावस्कर करंडकात 1-0 अशी आघाडी मिळवूनदेखील भारत 4 सामन्यानंतर भारत 2-1 या फरकाने पिछाडीवर आहे. भारतासाठी सिडनीतील पाचवा कसोटी सामना अत्यंत महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या शर्यतीत कायम राहिल. या सामन्यात विजयासह श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया संघाला 1-0 किंवा 2-0 अश्या फरकाने कसोटी मालिका हरवणं देखील गरजेचं आहे.
सिडनी कसोटीत विजय मिळवण्यासाठी भारतापुढे काही आव्हाने आहेत :
1) ऑस्ट्रेलिया संघाचा मध्यक्रम -
भारताला ट्रेव्हिस हेड, मार्नस लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथला कमी धावत बाद करणे गरजेचे आहे. या तिन्ही फलंदाजांमध्ये स्वतःच्या बळावर सामना जिंकवण्याची क्षमता आहे. ट्रेव्हिस हेड भारतासाठी डोकेदुखी ठरत आला आहे. जेव्हा भारताला सामना जिंकायचा असतो तेव्हा ट्रेव्हिस हेडने चांगली कामगिरी करून सामना ऑस्ट्रेलिया संघाला जिंकवला आहे. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन हे खेळाडूदेखील भारताला सहजगत्या आपली विकेट देणार नाहीत. भारतीय गोलंदाजांना त्यांना बाद करण्यासाठी बराच घाम गाळावा लागू शकतो.
2) ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. भारतीय फलंदाजांची कामगिरी ही चिंताजनक आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांच्या तिकडीने भारतीय खेळाडूंना त्यांच्या फलंदाजीच्या क्षमतेवर शंका निर्माण करण्यास भाग पाडलं आहे. भारताला जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगली फलंदाजी करणं अनिवार्य आहे.
या दोन आव्हानांची जर भारताने योग्यरित्या तयारी केली आणि चांगली कामगिरी केली तर सामना भारत जिंकू शकतो. त्याचसोबत बॉर्डर - गावस्कर करंडक भारत स्वतःकडे ठेवू शकेल.