मुंबई: भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेच. पण, त्याच्या हुशारीची स्तुती क्रिकेट तज्ञ आणि क्रिकेट रसिक नेहमी करताना दिसतात. यष्टिरक्षण करताना सह खेळाडूंना प्रेरीत करणं असो किंवा विरोधी संघाच्या खेळाडूंना विचलित करणं, रिषभ दोन्ही गोष्टी योग्य रीतीने करतो.
त्याच्या याचं हुशारीमुळे त्याला आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलं होतं.
रिषभ पंतने दिल्ली रणजी संघाचे कर्णधारपद नाकारले आहे. रिषभ 23 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या रणजी सामन्यात दिल्लीसाठी खेळणार आहे. सौराष्ट्रच्या निरंजन शाह क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रिषभला कर्णधारपद घेण्यासाठी दिल्ली संघाच्या प्रशिक्षकांकडून विचारण्यात आलं होतं. पण, रिषभ पंतने कर्णधारपद नाकारले आहे. रिषभने दिल्लीचा सध्याचा कर्णधार आयुष बडोनी वर विश्वास दाखवला आहे. तसंच दिल्ली संघाचे प्रशिक्षक सरनदीप सिंह यांच मत आहे की रिषभच्या येण्याने संघ अजून मजबूत होईल. रिषभ पंत 2018 नंतर प्रथमच रणजी सामना खेळणार आहे.
एकीकडे रिषभने दिल्ली संघाचे कर्णधारपद नाकारले आहे तर दुसरीकडे रिषभ पंत आईपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार होणार आहे हे जवळपास निश्चित आहे. रिषभ कर्णधार होणार आहे याची फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. पण, सूत्रानुसार हे जवळपास निश्चितच आहे की रिषभ पंत लखनऊ संघाच्या कर्णधारपदाची धुरा स्वीकारले. रिषभाला संघात घेण्यासाठी लखनऊ सुपर जायंट्स संघाने २७ कोटी रक्कम मोजली होती. त्यानंतर
रिषभ हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडूदेखील झाला होता.