AI Impact Summit 2026: भारताच्या यजमानपदाखाली नवी दिल्ली येथे जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान सोहळ्याला, म्हणजेच AI Impact Summit 2026 ला सुरुवात झाली आहे. मात्र, या कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांच्या उपस्थितीवरून मोठा पेच निर्माण झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने बिल गेट्स यांना दिलेले निमंत्रण मागे घेतले आहे. जेफ्री एपस्टाईन (Jeffrey Epstein) प्रकरणाशी संबंधित फाईल्समधून समोर आलेले नवीन खुलासे आणि गेट्स यांचे एपस्टाईनशी असलेले संबंध या पार्श्वभूमीवर हा धक्कादायक निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नैतिकता आणि राष्ट्रीय सुरक्षेचे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा आणि नैतिक निकषांच्या आधारावर घेण्यात आला आहे. बिल गेट्स यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, एपस्टाईनसोबतची त्यांची भेट केवळ धर्मादाय कारणांसाठी होती. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या काही कागदपत्रांमुळे त्यांच्या भूमिकेवर नैतिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, गेट्स फाउंडेशनच्या प्रवक्त्याने हे दावे फेटाळून लावले असून, बिल गेट्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत आणि नियोजित वेळेनुसार त्यांचे मुख्य भाषण देतील, असे स्पष्ट केले आहे.
45 हून अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित
या शिखर परिषदेचे गांभीर्य लक्षात घेता, जगभरातील अनेक बड्या नेत्यांनी यात हजेरी लावली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बोलिव्हिया, क्रोएशिया, एस्टोनिया, फिनलंड, ग्रीस, गयाना, कझाकस्तान, लिकटेंस्टाईन, सर्बिया आणि स्लोवाकियाचे या देशांचे प्रमुख परिषदेत सहभागी झाले आहेत. याव्यतिरिक्त, 45 हून अधिक देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळे आणि संयुक्त राष्ट्रांचे (UN) सरचिटणीस देखील या ऐतिहासिक समिटचा भाग बनले आहेत.
हेही वाचा - AI Impact Summit : भारतात AI चा नवा अध्याय! सरकारने जाहीर केली 7 सूत्री मार्गदर्शक तत्त्वे, कसे असेल देशातील तंत्रज्ञानाचे भविष्य?
आंतरराष्ट्रीय टेक कंपन्यांचे लक्ष
या एआय समिटमध्ये केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर जागतिक टेक कंपन्यांचे सीईओ देखील उपस्थित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) भविष्यातील वापर आणि त्यातील धोके यावर येथे मंथन होत आहे. अशा वेळी बिल गेट्स यांच्या निमंत्रणाबाबतचा वाद हा जागतिक मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. भारत सरकारकडून अधिकृतपणे अद्याप यावर सविस्तर स्पष्टीकरण आलेले नसले तरी, कार्यक्रमाच्या आयोजनात या वादामुळे काही अंशी अनिश्चितता निर्माण झाली आहे.