Pakistan Pulses Crisis : आर्थिक गर्तेत अडकलेल्या पाकिस्तानात आता अन्नान्न दशा होण्याची चिन्हे दिसत आहेत. गहू आणि पाण्याच्या टंचाईनंतर आता या देशाला डाळींच्या भीषण टंचाईचा (Pulses Crisis) सामना करावा लागत आहे. एकेकाळी डाळ निर्यात करणारा हा देश आज डाळीसाठी परदेशांपुढे हात पसरत असून, या संकटामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या चिंतेत भर पडली आहे.
निर्यातदार ते आयातदार: 1998 पासून सुरू झाली घसरण
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या अहवालानुसार, 1998 सालापूर्वी पाकिस्तान हा जगातील प्रमुख डाळ निर्यातदार देशांपैकी एक होता. मात्र, तत्कालीन परवेझ मुशर्रफ सरकारने डाळ निर्यातीवर बंदी घातली आणि तिथूनच या क्षेत्राचा ऱ्हास सुरू झाला. नफा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी डाळींचे उत्पादन घेणे बंद केले, परिणामी आज पाकिस्तानला आपल्या गरजेपैकी 80 टक्के डाळ आयात करावी लागत आहे.
धक्कादायक आकडेवारी:
वार्षिक गरज: 16.2 लाख टन
आयात: 10.7 लाख टन (सुमारे 80 टक्के)
आयातीचा खर्च: दरवर्षी साधारण 98 कोटी डॉलर परकीय चलन डाळीवर खर्च करावे लागते.
शेतकरी डाळींकडे का पाठ फिरवतायत?
शेती तज्ज्ञांच्या मते, मर्यादित नफा आणि सरकारी निर्बंधांमुळे शेतकरी डाळीऐजी इतर पिकांना प्राधान्य देत आहेत. 'AARI' चे सहाय्यक खालिद हुसैन यांच्या मते, डाळ केवळ मानवी पोषणासाठीच नव्हे, तर जमिनीचा कस टिकवण्यासाठीही महत्त्वाची असते. मात्र, उत्पादन घटल्याने पाकिस्तान आता पूर्णपणे जागतिक बाजारावर अवलंबून आहे.
हेही वाचा - Trump Tariffs : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला मोठा दणका; 24 फेब्रुवारीपासून 'या' कामाला स्थगिती
आगामी संकट मोठं
पंजाब पल्सेस इम्पोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष राणा मुहम्मद तैयब यांनी इशारा दिला आहे की, जर पाकिस्तानने तातडीने डाळींच्या उत्पादनासाठी ठोस धोरण आखले नाही, तर भविष्यात देशात अन्नाचे मोठे संकट उभे राहू शकते. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आता डाळींच्या आयातीसाठी पैसे कोठून आणायचे, हा मोठा प्रश्न आहे.