मुंबई, २८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता मोहीम सातत्याने सुरूच राहणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. स्वच्छता मोहीम राबविल्यानंतर तो परिसर कायमच स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
मुंबईत मागील २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरूप देत, दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवारी सर्व २५ प्रशासकीय विभागांत (वॉर्ड) लोकसहभागातून ही मोहीम राबवण्यात आली. महापालिका आयुक्तांनी या दौऱ्यात स्वच्छतेच्या कामांची पाहणी करताना, स्वतःदेखील मोहिमेत सहभाग घेतला.
प्रक्रियाकृत पाण्याचा वापर
मोहिमेसाठी प्रक्रिया केलेले पाणी (रिसायकल वॉटर) वापरात येते. पाण्याची नासाडी होत असल्याच्या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. महापालिकेकडे मोठ्या प्रमाणावर ‘रिसायकल वॉटर’ उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.