नवी दिल्ली, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी बिगुल वाजले आहे. सर्व राजकीय पक्ष आपापल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. ही प्रक्रिया सुरू असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला लक्ष्य करून एक ट्वीट केले आहे.
‘इतरांना धमकावणे ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे. केवळ पाच दशकांपूर्वी त्यांनी ‘वचनबद्ध न्यायपालिके’ची हाक दिली होती… ते निर्लज्जपणे त्यांच्या स्वार्थासाठी इतरांकडून वचनबद्धतेची मागणी करतात पण देशाबाबतची स्वतःची वचनद्धता सोयीस्कररित्या विसरतात;’ या शब्दात पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या ट्वीटला संदर्भ आहे तो एका पत्राचा. देशातील ६०० कायदेतज्ज्ञांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रावर अनेक प्रसिद्ध वकिलांच्या सह्या आहेत. सह्या करणाऱ्यांमध्ये हरीश साळवे आणि पिंकी आनंद यांच्यासह अनेक प्रसिद्ध वकील आहेत. पत्राद्वारे वकिलांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे की, एक गट देशातील न्यायव्यवस्था कमकुवत करत आहे. या गटाच्या कृतींमुळे न्यायसंस्थेच्या कामकाजाचे वैशिष्ट्य असलेल्या विश्वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. राजकीय बाबींमध्ये, विशेषत: भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राजकीय व्यक्तींचा समावेश असलेल्या त्यांच्या दबावाचे डावपेच सर्वात स्पष्ट आहेत. हे डावपेच आपल्या न्यायालयांसाठी हानिकारक आहेत. वकिलांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना मोदींनी ट्वीट करून काँग्रेसला लक्ष्य केले आहे.