श्रीनगर : मोदी सरकारचा शपथविधी सुरू असताना जम्मू काश्मीरमध्ये रियासी येथे भाविकांना घेऊन जात असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या घटनेपासून दहशतवादी हल्ल्यांना सुरुवात झाली. जम्मू काश्मीरमध्ये ७२ तासांत तीन दहशतवादी हल्ले झाले.
रियासी जिल्ह्यात रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी भाविकांना घेऊन जात असलेल्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात बस चालकाला गोळी लागली आणि त्याचे नियंत्रण सुटले. बस दरीत कोसळली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४१ जण जखमी झाले. यानंतर मंगळवारी ११ जून रोजी कथुआ येथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा पथकाने तातडीने प्रत्युत्तर दिले. या घटनेत एक दहशतवादी ठार झाला. इतर दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. नंतर बुधवारी १२ जून रोजी डोडा येथे दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी लष्करी तळाला लक्ष्य केले. छत्तरगाल येथे लष्करी तळावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले.