विजय चिडे, प्रतिनिधी,
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर यांच्या मृतदेहाचा शोध लागल्यानंतर परिसरात एकच गडबड निर्माण झाली आहे. फक्त 30 वर्षांच्या गणेश टेमकर यांच्या मृत्यूमागे नेमके काय घडले? हा अपघात होता की आत्महत्या की थेट घातपात? या प्रश्नांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गणेश टेमकर यांचा मृतदेह हदीयाबाद - मारवाडी महामार्गावरील नळकांडी पुलाजवळ मिळाला आहे. पक्षात सक्रिय असलेले, मेहनती आणि प्रभावी भूमिका बजावणाऱ्या टेमकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट उभे राहिले आहे. आई-वडील, भाऊ आणि बहिण अशा परिवारात गणेश हे महत्त्वाचे आणि सतत संघटनात गुंतलेले व्यक्तिमत्व होते.
गणेश टेमकर, राहणार भालगाव, तालुका गंगापूर, हे दोन दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबीय, मित्र, नातेवाईक, पक्षाचे कार्यकर्ते यांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांचा कुठेच शोध लागत नव्हता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास नळकांडी पुलाजवळ त्यांचा मृतदेह मिळाला आणि या प्रकरणाला रहस्यमय वळण मिळाले. स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि गौरव विधाते यांनी तात्काळ पोलीसांना यासंदर्भात कळवले. पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड पथकासह घटनास्थळी लगेचच पाहणी साठी गेले. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी तपासून ते मृत असल्याचे जाहीर केले. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी सुरू केली असून, मृत्यूच्या ठिकाणाचे स्वरूप, शरीरावरील जखमा आणि मिळालेल्या प्राथमिक माहितीमुळे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा स्थानिकांमध्ये वेगाने पसरली आहे. काही जणांच्या मते, गणेश टेमकर हे पक्षातील सक्रिय आणि ओळख असलेले पदाधिकारी असल्याने प्रकरणाच्या मागे वेगळेच धागेदोरे असू शकतात.
गणेश टेमकर यांच्या अचानक आणि संशयास्पद मृत्यूमुळे गंगापूर तालुका तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तपास वाढत असताना पुढील काही तास आणि दिवस हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Nowgam Blast: श्रीनगरमध्ये नौगाम पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; नऊ जणांचा मृत्यू, 29 जखमी