Friday, March 13, 2026 10:56:57 PM

Crime News: लॉ कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार! वर्गातच विद्यार्थिनीची हत्या; आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवरही गोळी झाडली

पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील कायदा महाविद्यालयात गोळीबार झाला.

crime news लॉ कॉलेजमध्ये गोळीबाराचा थरार वर्गातच विद्यार्थिनीची हत्या आरोपी विद्यार्थ्याने स्वतःवरही गोळी झाडली

Punjab college shooting: पंजाबमधील तरण तारण जिल्ह्यातील एका खासगी कायदा महाविद्यालयात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. वर्ग सुरू होण्याआधीच एका विद्यार्थ्याने आपल्या महिला सहाध्यायिनीवर गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेमुळे शिक्षणसंस्थांमधील सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही घटना उस्मा गावातील माई भागो लॉ कॉलेजमध्ये घडली. प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्या वर्षात शिकणारा २० वर्षीय प्रिन्स राज हा वर्गात आला आणि थोडक्यात संभाषणानंतर त्याने स्नेहदीप कौर या विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळी झाडली. अवघ्या १९ वर्षांची स्नेहदीप कौर घटनास्थळीच मृत्युमुखी पडली. त्यानंतर काही क्षणांतच आरोपी प्रिन्स राजने स्वतःवर गोळी झाडली.

गोळीबारानंतर कॉलेज परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत प्रिन्स राजला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. या संपूर्ण घटनेचे दृश्य कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अद्याप या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र, प्राथमिक तपासात दोघांमध्ये ओळखीचे किंवा मैत्रीचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तरण तारणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यांच्या संभाषणातून आणि डिजिटल पुराव्यांतून घटनेपूर्वी नेमकं काय घडलं, याचा शोध घेण्यात येणार आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्नेहदीप कौर ही नौशेरा पन्नुआन येथील रहिवासी होती. तिची आई हरजिंदर कौर या विधवा असून सात मुलींच्या कुटुंबाची जबाबदारी त्या एकट्याच सांभाळतात. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी कॉलेज प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“मी कष्ट करून माझ्या मुलींना शिक्षण देत आहे, जेणेकरून त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं. माझी मुलगी नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती,” असं सांगताना त्यांचा आवाज भरून आला. “मात्र, कॉलेजच्या वर्गात पिस्तूल कसं पोहोचलं? विद्यार्थ्यांकडे शस्त्र येऊ शकतं, तर कॉलेजची सुरक्षा व्यवस्था नेमकी कुठे आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात असून, शिक्षणसंस्थांमधील सुरक्षा तपासणी, प्रवेश नियंत्रण आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.


सम्बन्धित सामग्री