Friday, May 16, 2025 02:35:50 PM

अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजी खोदकामामुळे मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया गेलं, अर्ध्या शहरात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.

अमळनेरमध्ये जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटली लाखो लिटर पाणी वाया

जळगाव: अमळनेर शहरातील मुंदडा नगर भागात जेसीबीच्या निष्काळजीपणामुळे मोठा अपघात घडला. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाईन जेसीबीच्या खोदकामादरम्यान फुटली. या घटनेत लाखो लिटर पाणी वाया गेले असून, अर्ध्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरातील वायर टाकण्याच्या कामासाठी मुंदडा नगर भागात जेसीबीद्वारे खोदकाम सुरू होते. मात्र, खोदकाम करताना पाईपलाईनचं स्थान माहित नसल्यामुळे, आणि पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे जेसीबीचा फावडा थेट मुख्य पाईपवर आदळला. काही सेकंदांतच प्रचंड दाबाने पाणी रस्त्यावरून वाहू लागले. ही जलवाहिनी शहरातील लक्ष्मीनगर, समतानगर, स्टेशन रोड, शांतीनगर, आयटीआय रोड आदी भागांना पाणीपुरवठा करते. त्यामुळे आता या परिसरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचे अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने पाणीपुरवठा थांबवण्यात आला आणि पाइपलाइन दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, यासाठी काही तास लागणार असल्याने नागरिकांना पुढील काही दिवसांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र? राज ठाकरेंच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण
 

कामाच्या ठिकाणी योग्य माहिती आणि समन्वय नसल्यामुळेच हे नुकसान झाले, असे मत स्थानिक नगरसेवकांनी व्यक्त केले. “अशा महत्वाच्या पाईपलाईनच्या नकाशाचा अभ्यास न करता जेसीबीने सरळ खोदकाम सुरू केल्यामुळे हे नुकसान झाले आहे. याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. “सतत अशा निष्काळजीपणामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो आणि नाहक त्रास सहन करावा लागतो,” अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.

नगरपरिषद प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. “जलवाहिनीचे नुकसान आणि पाण्याची नासाडी टाळण्यासाठी यापुढे प्रत्येक खोदकामाच्या ठिकाणी प्राथमिक तपासणी केली जाईल,” अशी ग्वाही मुख्याधिकारी राजेश वानखेडे यांनी दिली.

या घटनेने एकदा पुन्हा जलसंपत्तीच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. लाखो लिटर पाणी वाया जाणं ही केवळ आर्थिक हानी नाही, तर पर्यावरणीय संकटही आहे. त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांनी यापुढे अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री