Monday, May 11, 2026 12:10:12 PM

Sharad Ponkshe: 'एक लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल...'; अभिनेते शरद पोंक्षे यांचं रोखठोक विधान

नांदेड येथील 'परशुराम तेजोत्सव' व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी इतिहास, चित्रपट आणि सध्याच्या राजकीय-धार्मिक परिस्थितीवर अत्यंत प्रखर भाष्य केले.

sharad ponkshe एक लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल अभिनेते शरद पोंक्षे यांचं रोखठोक विधान

Sharad Ponkshe: आपल्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नांदेड येथील 'परशुराम तेजोत्सव' व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी इतिहास, चित्रपट आणि सध्याच्या राजकीय-धार्मिक परिस्थितीवर अत्यंत प्रखर भाष्य केले. "मुघल-ए-आझम चित्रपटात अकबराची प्रतिमा उजळण्यासाठी इतिहासात नसलेले 'जोधा' हे पात्र घुसवले गेले. प्रत्यक्षात एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल," असे विधान पोंक्षे यांनी यावेळी केले.

इतिहास आणि चित्रपटसृष्टीवर टीका
शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि तत्कालीन सिस्टीमवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, "ब्राम्हणांची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करण्यासाठी दूरदर्शनवर मालिका दाखवण्यात आली. पद्धतशीरपणे हिंदूंच्या मनावर चुकीचा इतिहास बिंबवण्याचे काम झाले." जातीपातीच्या वादाला मुस्लीम आक्रमणे आणि ब्रिटिश राजवट कारणीभूत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

"मंदिरांवरच सरकारचा ताबा का?"
हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनावर भाष्य करताना पोंक्षे यांनी पक्षपाताचा आरोप केला. "देशातील 4 लाख हिंदू मंदिरांचा पैसा सरकारी तिजोरीत जातो, ज्याचा वापर इतरांच्या कल्याणासाठीही होतो. मात्र, चर्च किंवा मशिदींच्या पैशांवर सरकारचे नियंत्रण का नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदुत्वाची वज्रमूठ काँग्रेसने फोडल्यामुळेच आज लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास कचरत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Bollywood On Women Reservation: रितेश देशमुखसह बॉलीवूडमधील ‘या’ सेलिब्रिटींचा महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा; कोणाच्या काय आहेत प्रतिक्रिया?

पंतप्रधान मोदी आणि हिंदू समाज
हिंदू समाजाच्या मानसिकतेवर भाष्य करताना पोंक्षे यांनी एक खोचक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "हिंदू कधीही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत नाही. जर तुम्ही स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्षच करणार नसाल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करावे?" सेक्युलरवादाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्याच धार्मिक स्थळांवर सरकारचा अंकुश का आहे, यावर त्यांनी संताप व्यक्त केला. पोंक्षे यांच्या या विधानांमुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री