Friday, March 13, 2026 07:56:32 AM

Kantara Controversy: 'तुम्ही रणवीर सिंग असाल तर मग काय झालं...'; कांतारा वादावरून हायकोर्टाने अभिनेत्याला सुनावलं

'कांतारा' चित्रपटातील पात्राची नक्कल करताना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणवीर सिंगला कर्नाटक उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे.

kantara controversy तुम्ही रणवीर सिंग असाल तर मग काय झालं कांतारा वादावरून हायकोर्टाने अभिनेत्याला सुनावलं

Kantara Controversy: गोव्यातील 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) 'कांतारा' चित्रपटातील पात्राची नक्कल करताना धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अभिनेता रणवीर सिंगला कर्नाटक उच्च न्यायालयाने कडक शब्दांत फटकारले आहे. या सादरीकरणादरम्यान रणवीरने एका देवतेचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. नागाप्रसन्ना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, तुम्ही कोणीही मोठे सेलिब्रिटी असाल, तरी तुम्हाला लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा अधिकार नाही. मात्र, न्यायालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की, पुढील सुनावणीची तारीख म्हणजेच सोमवार, 2 मार्चपर्यंत रणवीर सिंगवर कोणतीही सक्तीची कारवाई (अटक) केली जाऊ नये.

नेमकं प्रकरण काय?
वृत्तानुसार, IFFI महोत्सवात रणवीर सिंगने "कंतारा चॅप्टर 1" मधील ऋषभ शेट्टी यांच्या पात्राची नक्कल केली होती. या दरम्यान त्याने एका देवतेचा उल्लेख 'स्त्री भूत' असा केला, ज्यामुळे कर्नाटकातील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या प्रकरणी विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक अपमान केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, "रणवीर कर्नाटकचा जावई आहे, पण त्याने जे केले ते आमच्या हृदयाला नाही तर आत्म्याला लागलेले आहे."

न्यायालयाचे ताशेरे
सुनावणीदरम्यान न्यायालयाने सार्वजनिक व्यक्तींच्या प्रभावाबद्दल गंभीर भाष्य केले. "एक अभिनेता म्हणून तुमचा लाखो लोकांवर प्रभाव असतो, त्यामुळे तुम्ही जबाबदार असले पाहिजे. तुम्ही कोणाचीही नक्कल करू शकता, पण धार्मिक चिन्हांचा अपमान करू शकत नाही," असे न्यायालयाने म्हटले. जेव्हा रणवीरच्या वकिलाने अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल माफीचा उल्लेख केला, तेव्हा न्यायाधीश म्हणाले, "तुमची माफी तुमचे शब्द मागे घेऊ शकेल का? मी विसरून जाईन, तुम्ही विसराल, पण इंटरनेट कधीही विसरत नाही."

वकिलाने मान्य केली चूक
रणवीर सिंगच्या वतीने वरिष्ठ वकील साजन पूवय्य यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांनी कबूल केले की, रणवीरने केलेली विधाने पूर्णपणे निष्काळजीपणाची होती आणि त्याबद्दल त्याने माफीही मागितली आहे. पूवय्य म्हणाले, "माझा निष्काळजीपणा दुरुस्त करण्यासाठी मी जे काही करावे लागेल ते करण्यास तयार आहे." यावर न्यायालयाने उत्तर दिले की, राज्याच्या भावनांशी कोणीही खेळू शकत नाही. स्टेजवर सादरीकरण करताना कलाकारांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे.

हेही वाचा - Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या निधनाने पुरती कोलमडली अभिनेत्री

पुढील सुनावणी 2 मार्च रोजी
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 2 मार्चपर्यंत तहकूब केली आहे. तोपर्यंत तक्रारदाराला आपले आक्षेप नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणातील अंतरिम दिलासा मिळाला असला, तरी 2 मार्चच्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री