मुंबई: रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधा, आदी. गोष्टींमुळे अनेकजण विविध शहरांत स्थलांतर करतात. त्यामुळे, कामानिमित्त प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणी येतात. या समस्यांवर एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पॉड टॅक्सीबाबत महत्त्वाची बैठक घेतली. यादरम्यान, मुख्यमंत्री फडणवीसांनी असे निर्देश दिले की, 'सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासोबतच नागरिकांना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी प्रदान करणे गरजेचे आहे. वाहतूक सेवेतील पुढचे पाऊल पॉड टॅक्सी आहे आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटीसाठी ही सेवा नागरिकांच्या सेवेत आणली पाहिजे'.
हेही वाचा: Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या हस्ते शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण; इथेच सुरू झाली होती सचिनची कारकीर्द
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'मुंबईत एकाच कार्डच्या मदतीने सर्व वाहतूक सेवांमध्ये प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक प्रणाली तयार केली जात आहे. नागरिकांनाही या एकाच कार्डच्या मदतीने पॉड टॅक्सीच्या सेवांचा लाभ घेता येईल, याची खात्री करण्यासाठी उपाययोजना करावी. कुर्ला आणि वांद्रे स्थानक परिसर पॉड टॅक्सींप्रमाणेच विकसित केला पाहिजे, कुर्ला स्थानक परिसरात असलेल्या पोलिसांच्या निवासस्थानाऐवजी त्याच परिसरात पोलिसांना जागा उपलब्ध करून देण्यात यावी. सोबतच, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील इमारती या पॉड टॅक्सीने स्टेशनला जोडण्यात यावे'.
पॉड टॅक्सी म्हणजे काय?
पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट म्हणजेच पॉड टॅक्सी ही टेक्निकल कार आहे. ही पॉड टॅक्सी पूर्णपणे स्वयंचलित असून विनाड्रायव्हर असेल. एकाच वेळी 3 ते 6 प्रवाशांचा प्रवास यातून शक्य होईल. ही पॉड टॅक्सी उर्जेच्या मदतीने धावणार. सोबतच, प्रदूषण रोखण्यासाठी हा एक उत्तम पर्याय मानला जात आहे.