मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यात कला, क्रीडा आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात या पुरस्कारांवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. विशेषतः महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झालेल्या 'पद्मभूषण' पुरस्कारामुळे राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी यावर सडकून टीका केली आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे - भाजपचे सरकार बसवण्यात ज्यांची भूमिका होती, अशा महाशयांना मोदी सरकारने पद्म भूषण किताबाने सन्मानित केले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या सन्मानामुळे लोकशाही मूल्यांची पायमल्ली केल्याचा संदेश जात असल्याचे त्यांनी सूचित केले.
राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, “याच भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले - सावित्रीबाई फुले दाम्पत्याबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती,” असा आरोप करत त्यांनी या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या गेल्याचे नमूद केले.
हेही वाचा: IPS Abhijit Patil Success Story : लहान मुलासारखा दिसणारा IPS अधिकारी आहे तरी कोण? लहान वयात UPSC पास करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या
भाजपवर थेट टीका करत संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान करणे ही भाजपची भूमिका आहे,” असा घणाघात त्यांनी केला. अशा व्यक्तींना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देणे म्हणजे महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आपल्या पोस्टच्या शेवटी “छान!” असा उपरोधिक शब्दप्रयोग करत राऊत यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या पोस्टमुळे पद्म भूषण पुरस्कार, राज्यपालांची भूमिका आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या आरोपांवर भाजप किंवा संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा: PM Modi Wish on Republic Day: पंतप्रधान मोदींनी संस्कृत श्लोकातून सांगितले स्वातंत्र्याचे महत्व; देशवासियांना दिल्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा