विक्रोळी: विक्रोळी परिसरात सकाळी 11 वाजता झालेल्या कारवाईत विक्रोळी पोलिसांनी 13 बांग्लादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या सर्वांच्या आधारकार्डवर 1 जानेवारी हीच जन्मतारीख नमूद आहे, तसेच पत्ता साहेबगंज, झारखंडचा दर्शवण्यात आला आहे.
27 एप्रिल रोजी, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामथ, युवराज मोरे, गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी विक्रोळी मार्केटमध्ये भेट दिली असता, त्यांना डझनभर संशयित फेरीवाले आढळले. तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आणि या बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले.
कीरीट सोमय्या यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, ही बाब अतिशय गंभीर आहे. विदेशी नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहात असून त्यांच्या हालचाली तपासण्याची गरज आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावं आणि त्यांची जन्मतारीख खालीलप्रमाणे आहेत:
जियाउल शेख - 01-01-1981
अयुब शेख - 01-01-1976
मनोरूल शेख - 01-01-1995
सायम शेख - 01-01-2003
नईम शेख - 01-01-2003
सामून शेख - 01-01-2003
रफीकुल शेख - 01-01-1998
जहाँगीर शेख - 01-01-2007
नसीमा बिबी - 01-01-1983
मैनुद्दीन शेख - 01-01-2000
बरीउल शेख - 01-01-2003
हलीम शेख - 01-01-2006
कासूद शेख - 01-01-2004
हेही वाचा: जन्मदात्या वडिलांनी केली मुलीची गोळीबार करून हत्या; चोपड्यात सैराटची पुनरावृत्ती
प्रत्येक व्यक्तीच्या आधारकार्डवर एकसारखीच जन्मतारीख असणे संशयास्पद मानले जात असून, हे आधारकार्ड खरी आहेत की बनावट, याची चौकशी पोलिस करत आहेत. या घटनेमुळे विक्रोळी परिसरातील स्थानिक नागरिकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. या फेरीवाल्यांनी कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला, त्यांच्यासोबत आणखी कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. परदेशी नागरिक बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्यास असल्यास, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
संपूर्ण प्रकरणाचा तपास विक्रोळी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी स्वतः पाहत असून, लवकरच अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.