World Earth Day: जगभरात दरवर्षी 22 एप्रिल रोजी 'जागतिक वसुंधरा दिवस' (World Earth Day) साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात 1970 साली अमेरिकेतील एका पर्यावरणीय चळवळीने केली होती. त्या काळात औद्योगिकीकरणामुळे वाढणारे प्रदूषण, जैवविविधतेचा ऱ्हास आणि निसर्गाच्या ऱ्हासाबाबत जनजागृती करण्यासाठी ‘गेलॉर्ड नेल्सन’ या अमेरिकन सिनेटरने ही संकल्पना मांडली. पुढे ही कल्पना जागतिक स्तरावर पसरली आणि आज 190 हून अधिक देशांमध्ये वसुंधरा दिन साजरा केला जातो. यामागील उद्देश म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणसंवर्धनासाठी जनजागृती करणे, लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी निसर्गसंपत्तीचे रक्षण करणे.
परंतु, पर्यावरणसंवर्धनाचा विचार हा केवळ आधुनिक युगातला नाही. भारताची प्राचीन हिंदू संस्कृती ही निसर्गाशी सख्य नातं ठेवणारी होती. 'वसुधैव कुटुंबकम्' हे तत्त्वज्ञान म्हणजे पृथ्वीवरचा प्रत्येक जीव आपला कुटुंबीय आहे, ही भावना सांगते. ऋग्वेद, यजुर्वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये निसर्गाची देवतांसारखी पूजा केली गेली आहे. वृक्षांची उपासना, नद्यांना माता मानणे, पर्वतांना पवित्र मानणे ही केवळ श्रद्धेची नव्हे तर पर्यावरणस्नेही जीवनशैलीची उदाहरणे आहेत. अशा विचारातून निसर्गसंवर्धन ही केवळ जबाबदारी नव्हे, तर एक धार्मिक आणि नैतिक कर्तव्य मानले गेले.
आजच्या काळात पर्यावरणीय संकटे अधिक तीव्र होत चालली आहेत हवामान बदल, पाण्याचा तुटवडा, जंगलांची कटाई आणि जैवविविधतेचा ऱ्हास. अशा वेळी आपला प्राचीन वारसा आणि निसर्गाशी असलेले नातं नव्याने समजून घेणे गरजेचे झाले आहे. जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने कृती करणे, ही काळाची गरज आहे. विज्ञानाच्या मदतीने पण मूल्यांच्या आधारे आपण निसर्गाशी संतुलन साधू शकतो. कारण पर्यावरण ही केवळ वैज्ञानिक बाब नसून ती आपल्या संस्कृतीचा, आत्म्याचा आणि भविष्याचा भाग आहे.