जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे राज्यातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या पावलं उचलण्यात आली आहेत. या भीषण हल्ल्यात 26 निरपराध लोकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमधील नंदनवन म्हणवणाऱ्या अनेक पर्यटनस्थळांवर तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि वनविभागाने मिळून आतापर्यंत 87 पर्यटन स्थळांपैकी तब्बल 48 ठिकाणं पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सर्व ट्रेकिंग मार्ग देखील बंद करण्यात आले होते. केंद्र सरकारकडून पाकिस्तानच्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू असतानाच स्थानिक पातळीवर सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे.
हेही वाचा: लडाखचं नशीब चमकलं! काश्मीरचं बुकींग बंद, सियाचीन-गलवान हाऊसफुल्ल! आता काय म्हणतील पाकडे अन् चीनी?
सुट्यांचा हंगाम असल्याने काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता होती. मात्र, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक पर्यटकांची स्वप्न सफर अधुरी राहण्याची शक्यता आहे. काही पर्यटकांना काश्मीरमध्ये पोहोचल्यावरच प्रवेशबंदीबाबत माहिती मिळत आहे, ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसानही होत आहे.
प्रवेशबंदीच्या ठिकाणांमध्ये युसमर्ग, तौसीमैदान, अहरबल, कौसरनाग, सिंथन टॉप, मार्गन टॉप, दाचिगम, हुंग पार्क, बुद्धिस्ट मॉनेस्ट्री, फॉरेस्ट हिल कॉटेज, जामिया मस्जिद आणि इतर अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या बंदीमुळे स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: उरीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था; पाकड्यांकडून एलओसीजवळ पुन्हा युद्धबंदीचं उल्लंघन
सध्या काश्मीरमधील उर्वरित पर्यटनस्थळांवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पर्यटकांची तपासणी कडक करण्यात आली आहे. तरीही, लष्कराचं सुरू असलेलं कोम्बिंग ऑपरेशन, पाकिस्तानकडून होणाऱ्या वारंवार युद्धबंदीच्या उल्लंघनामुळे काही पर्यटकांनी सध्या काश्मीरची सफर टाळण्याचा निर्णय घेतला आहे.