Thursday, February 12, 2026 03:24:03 PM

Gujarat Leopard Attack: बाप असावा तर असा! मुलाचा जीव वाचवण्यासाठी वडिलांची बिबट्याशी झुंज; भाला अन् विळ्याने...

आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका वृद्ध वडिलांनी चक्क भाला आणि विळा घेऊन बिबट्याशी दोन हात केले.

gujarat leopard attack बाप असावा तर असा मुलाचा जीव वाचवण्यासाठी वडिलांची बिबट्याशी झुंज भाला अन् विळ्याने

Gujarat Leopard Attack : गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्यातील गांगडा गावाच्या हद्दीत गुरुवारी दुपारी शौर्याची एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यासाठी एका वृद्ध वडिलांनी चक्क भाला आणि विळा घेऊन बिबट्याशी दोन हात केले. या रक्तरंजित संघर्षात वडिलांनी बिबट्याला संपवून मुलाचे प्राण वाचवले आहेत.

अचानक हल्ला आणि जीवाची बाजी
मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या घराबाहेर बसले असताना जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वडिलांच्या किंकाळ्या ऐकून मुलगा मदतीसाठी धावला, मात्र बिबट्याने आपला मोर्चा मुलाकडे वळवला. बिबट्याने मुलाला गंभीर जखमी करून रक्तबंबाळ केले होते. स्वतः पहिल्या हल्ल्यात जखमी झाले असूनही, मुलाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून वडिलांनी विलक्षण धाडस दाखवले. त्यांनी जवळच असलेला भाला आणि विळा उचलला आणि बिबट्यावर तुटून पडले.

हेही वाचा - Neral Khopoli : नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून जीवघेणा चाकूहल्ला; शिवसेना माजी जिल्हाध्यक्षाचे नाव समोर

रक्तरंजित संघर्ष आणि गावकऱ्यांची साक्ष
प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी या दृश्याचे वर्णन अत्यंत तीव्र आणि भयानक असे केले आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या वृद्ध पित्याने बिबट्यावर वारंवार वार केले. हा संघर्ष बिबट्या जागीच ठार होईपर्यंत सुरू होता. या थरारात वडील आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वन विभागाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे.

गुजरातमध्ये वाढती बिबट्यांची संख्या
गुजरातच्या वन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या आता 2200 च्या पार गेली आहे. विशेषतः सौराष्ट्र आणि कच्छ भागात बिबट्यांचा वावर मोठा आहे. बिबटे शिकारीच्या शोधात अनेकदा मानवी वस्तीजवळ येतात, ज्यामुळे अशा जीवघेण्या घटना घडतात. अलीकडेच दाहोद जिल्ह्यातील रतनमहाल जंगलात वाघांचेही दर्शन घडले आहे, जे राज्यातील वन्यजीव वाढीचे प्रतीक मानले जात असले तरी त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वन अधिकाऱ्यांनी आता या भागात वाढीव दक्षता घेण्याची आणि मानवी वस्त्यांभोवती भक्कम कुंपण घालण्याची गरज व्यक्त केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री