पहलगाम: मंगळवारी, काश्मीरमधील पहलगाम येथे आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटक मृत्यूमुखी पडले आहेत. 26 पैकी 6 पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पीडितांना भेटण्यासाठी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम येथे पोहोचले असून, या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना त्यांनी सांत्वन दिले.
केंद्रीय गृहमंत्री पहलगाम दौऱ्यावर
बुधवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाम येथे पोहोचले आणि दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांशी भेट घेतली, त्यांची विचारपूस केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, 'पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावल्याचे दुःख प्रत्येक भारतीयाला जाणवत आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही. मी या सर्व कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला आश्वासन देतो की निष्पाप लोकांना मारणाऱ्या या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही'.
हेही वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी साधला श्रीनगरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत संवाद
मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत जाहीर
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबीयांना जम्मू-काश्मीर सरकारने दहा लाखांची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना दोन लाखांची आणि किरकोळ जखमी झालेल्यांना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.