Air India Loss: मागील आर्थिक वर्ष एअर इंडियासाठी अत्यंत धक्कादायक ठरले असून कंपनीच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एअर इंडियाला तब्बल 220 अब्ज रुपयांचा (सुमारे 2.4 अब्ज डॉलर्स) वार्षिक तोटा सहन करावा लागला आहे. हा आकडा कंपनीने स्वतः वर्तवलेल्या 1.6 अब्ज डॉलर्सच्या अंदाजित तुटीपेक्षा कितीतरी जास्त आहे. या आर्थिक संकटामुळे एअर इंडियाने आता आपल्या भागधारकांकडे तातडीच्या आर्थिक मदतीसाठी धाव घेतली आहे.
अपघात आणि युद्धजन्य परिस्थितीचा फटका
या प्रचंड तोट्यामागे अनेक दुर्दैवी घटनांची साखळी कारणीभूत आहे. जून 2025 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाचा भीषण अपघात ज्यात 240 प्रवाशांचा बळी गेला. यामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला आणि अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. तसेच, मध्यपूर्वेतील संघर्ष आणि पाकिस्तानने हवाई हद्द बंद केल्यामुळे, युरोप व अमेरिकेला जाण्यासाठी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागल्याने इंधन खर्चात भरमसाठ वाढ झाली आहे. एअर इंडियाच्या एकूण क्षमतेचा 16 टक्के वाटा व्यापणारा मध्यपूर्व भाग सध्या संघर्षामुळे ठप्प झाला आहे.
भांडवल उभारणीसाठी टाटा आणि सिंगापूर एअरलाईन्सशी चर्चा
या आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी एअर इंडियाचे प्रमुख भागधारक 'टाटा समूह' आणि 'सिंगापूर एअरलाईन्स' (ज्यांची 25.1 टक्के भागीदारी आहे) यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. कंपनीला मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज आहे, मात्र मिळणारी मदत प्रत्यक्ष गरजेपेक्षा कमी असण्याची शक्यता असल्याने एअर इंडियाला इतर पर्यायांचाही विचार करावा लागणार आहे. त्यातच अमेरिकेच्या व्हिसाविषयक कडक धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय नफ्यावरही परिणाम झाला आहे.
हेही वाचा - KLM Airlines Controversy: 49 लाख रुपये खर्च केले; बिझिनेस क्लासची तिकिटे काढली... पण विमानात चढूच दिले नाही!
नेतृत्व बदल आणि सुरक्षा मानकांचा प्रश्न
आर्थिक संकटासोबतच कंपनीला नेतृत्वाचेही ग्रहण लागले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कॅम्पबेल विल्सन यांनी वर्षाअखेरीस पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, विमानन नियामक प्राधिकरणांच्या लेखापरीक्षणात (Audit) सुरक्षा मानकांच्या बाबतीत एअर इंडियाला सर्वात खालचा क्रमांक मिळाला आहे. हा रेटिंगचा फटका आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे एअर इंडियाची पुढील वाटचाल अधिक आव्हानात्मक होणार असल्याचे दिसत आहे.