बलूच: भारताने पहलगाम घटनेनंतर पाकिस्तानवर विविध आघाड्यांवर दबाव वाढवला आहे. पाण्याचा पुरवठा थांबवण्याबरोबरच आर्थिक संबंधांवरही गदा आणल्याने पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. या दबावामुळे चिडलेल्या पाकिस्तानने भारताला वारंवार धमक्या दिल्या, तर त्यांच्या पंतप्रधानांनीही आक्रमक विधानं करायला सुरुवात केली आहे. मात्र आता पाकिस्तान स्वतःच्या देशातील अंतर्गत बंडखोरांच्या हल्ल्याने थरथरला आहे.
बलूचिस्तानच्या क्वेटा येथील मार्गट परिसरात बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्लाकेला आहे. बीएलएने आयईडीचा (रिमोट कंट्रोल स्फोटक उपकरण) वापर करून पाक लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केलं. या भीषण स्फोटात पाकिस्तानचे 10 सैनिक जागीच ठार झाले आहेत. बलूच लिबरेशन आर्मीच्या म्हणण्यानुसार, हा हल्ला त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग आहे.
क्वेटा आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही वर्षांपासून बलूच बंडखोर चळवळीचा केंद्रबिंदू राहिला आहे. बीएलएच्या या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारने अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही. मात्र, स्थानिक वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार या घटनेमुळे पाकिस्तानी प्रशासनात मोठी घबराट पसरली आहे.