Weather Update: देशातील अनेक राज्यांमध्ये कडक उष्णता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. बुधवारपासून दिल्ली-एनसीआरमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासोबतच आज देशातील 20 राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्ये आधीच लूच्या विळख्यात आहेत. राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. राजस्थानमधील सहा जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशसह अनेक राज्यांमध्ये वादळाचा अंदाज -
हवामान खात्याने आज देशातील अनेक राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने सांगितले की, मंगळवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह देशातील 20 राज्यांमध्ये वादळ आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या काही भागात गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा - Marathwada weather update today : पुण्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता
ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसाची शक्यता -
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस आणि वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये आजही पावसाचा जोर कायम राहील. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आसाम, मणिपूर आणि मेघालयातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - जळगावात अवकाळी पावसाचा कहर; गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान
बिहारमध्ये वीज कोसळून 4 जणांचा मृत्यू -
बिहारमध्ये आजही अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवारी बिहारमध्ये वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. वीज कोसळून अरवलमध्ये तीन आणि गोपाळगंज जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.