बिहार: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदार मोठ्या उत्साहाने मतदान करत आहेत. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 47.62 टक्के मतदान नोंदवले गेले असून हे पहिल्या टप्प्यातील याच वेळेच्या 42.31 टक्के मतदानापेक्षा अधिक आहे. जिल्हावार आकडेवारी पाहता, किशनगंज जिल्ह्यात सर्वाधिक 51.86 टक्के मतदान झाले आहे, तर मधुबनीमध्ये सर्वात कमी 43.39 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. याशिवाय गया (50.95 टक्के), जमुई (50.91 टक्के), औरंगाबाद (49.45 टक्के), बांका (50.07 टक्के), पूर्णिया (49.63 टक्के) आणि पश्चिम चंपारण (48.91 टक्के) येथेही मतदान सुरळीत आणि उत्साहात पार पडले.
मतदारसंघानुसार पाहता सुपौलमध्ये 47.66 टक्के, सासाराममध्ये 45.23 टक्के, मोहनिया 50.97 टक्के, कुटुंबा 49.68 टक्के, गया टाउन 39.09 टक्के, चैनपूर 51.05 टक्के, धामदहा 50.16 टक्के, हरसिद्धी 46.62 टक्के आणि झंझारपूरमध्ये 40.63 टक्के मतदान झाले. या टप्प्यात एकूण 20 जिल्ह्यांतील 122 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सुमारे 3.7 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत, ज्यात 1,95,44,041 पुरुष, 1,74,68,572 महिला आणि 943 तृतीयपंथी मतदार सामील आहेत.
हेही वाचा:Donald Trump : भारतावरील टॅरिफ होणार कमी?; डोनाल्ड ट्रम्प भारताविषयी म्हणाले '...आम्ही खूप जवळ आलो आहोत'
या टप्प्यात मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या कॅबिनेटमधील 12 मंत्र्यांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. जनता दल (यु) कडून विजेंद्र यादव (सुपौल), लेसी सिंह (धामदहा), जयंत कुशवाहा (अमरपुर), सुमित सिंह (चकाई), मोहम्मद जामा खान (चैनपूर) आणि शीला मंडल (फुलपरस) हे उमेदवार आहेत. भाजपकडून प्रेम कुमार (गया), रेनू देवी (बेतिया), विजय कुमार मंडल (सिकटी), नितीश मिश्रा (झंझारपूर), नीरज बबलू (छटापूर) आणि कृष्णानंदन पासवान (हरसिद्धी) हे उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातील 122 जागांपैकी पूर्व चंपारणमध्ये 11, मधुबनी आणि गया येथे प्रत्येकी 10, पश्चिम चंपारणमध्ये 9, सीतामढीमध्ये 8, तसेच भागलपूर, रोहतास, पूर्णिया आणि कटिहारमध्ये प्रत्येकी 7 जागांसाठी मतदान होत आहे. अररिया आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी 6, तर नवादा, बांका आणि सुपौलमध्ये प्रत्येकी 5 जागांवर मतदान सुरू आहे. कैमूर, जमुई आणि किशनगंजमध्ये प्रत्येकी 4, जहानाबादमध्ये 3, अर्वलमध्ये 2 आणि शेओहरमध्ये 1 मतदारसंघ आहे.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत या 122 जागांपैकी भाजपने 42, राजदने 33, जदयूने 20, काँग्रेसने 11 आणि डाव्या पक्षांनी 5 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजप, जदयू, हम (S), लोजपा (RV) आणि इतर मित्रपक्षांनी मिळून तयार केलेला एनडीए आघाडी सरकार पुन्हा स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे महागठबंधन, ज्यामध्ये राजद, काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी पक्ष आहेत, सत्तेत पुनरागमनाच्या तयारीत आहे. याशिवाय जनसुराज पक्षही काही जागांवर स्पर्धेत आहे. पहिल्या टप्प्यात विक्रमी 65.08 टक्के मतदान झाले होते, जे बिहारच्या निवडणूक इतिहासातील सर्वाधिक आहे. मतदानाची मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बिहारसोबतच सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातही पोटनिवडणुका होत आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये 34.01 टक्के, नगरोता 52.44 टक्के, राजस्थानातील अंता 47.77 टक्के, झारखंडमधील घाटशिला 54.08 टक्के, तेलंगणातील जुबिली हिल्स 31.94 टक्के, पंजाबमधील तारणतारण 36.62 टक्के, मिझोरममधील डांपा 56.35 टक्के आणि ओडिशातील नुआपाडा येथे 51.42 टक्के मतदान नोंदवले गेले आहे.
हेही वाचा: Naseem Shah House Firing : श्रीलंका मालिकेपूर्वी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या घरावर गोळीबार; पोलिसांकडून तपास सुरू