पाकिस्तान: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला खुलेआम धमकी दिली. आमचे पाणी सिंधू नदीत वाहील, नाहीतर त्यांच्या रक्ताची धार वाहील, असे भडक विधान त्यांनी केले.
भारताने सिंधू नदी करार थांबवल्याने पाकिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भुट्टोंचे आक्रमक भाष्य आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरत आहे. भुट्टो म्हणाले की, सिंधू नदी प्राचीन काळापासून पाकिस्तानच्या भूभागाचा भाग आहे आणि ही नदी पाकिस्तानचीच राहणार. भारताने सिंधू पाणी करार मोडण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास पाकिस्तान कधीही गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
भुट्टोंनी आपल्या भाषणात म्हटले की, हजारो वर्षांपासून आम्ही या नदीचे वारस आहोत. भारताच्या लोकसंख्येच्या आधारावर किंवा कोणत्याही दबावाखाली आमच्या पाण्यावर हक्क नाकारता येणार नाही. त्यांनी भारतावर गंभीर आरोप करत सांगितले की, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर खोटे आरोप केले आणि आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सिंधू करार थांबवण्याचा एकतर्फी निर्णय घेतला.
हेही वाचा: हिमाचल राजभवनातून पाकिस्तानचा झेंडा हटवला; 53 वर्षांनंतर ऐतिहासिक टेबलवरून स्मारक हटवले
पाकिस्तानची जनता शूर असून भारताच्या प्रत्येक आक्रमक पावलाला शौर्याने उत्तर देईल, असेही भुट्टो म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानच्या चारही प्रांतांच्या ऐक्याचा उल्लेख करत सांगितले की, सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा हे चारही प्रांत चार भावांसारखे आहेत. भारताच्या चुकीच्या निर्णयांना संयुक्तपणे उत्तर दिले जाईल.
भुट्टोंनी आपल्या आई आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टोंचा उल्लेख करत सांगितले की, सिंध प्रांतातील लोकांनी नेहमीच नदीवर अनावश्यक धरणे आणि कालवे बांधण्याच्या योजनांना विरोध केला आहे. भविष्यातही सिंधू पाणी करारात कोणताही बदल करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असे ते ठामपणे म्हणाले.
भारताने सिंधू पाणी करार थांबवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने या कृतीला युद्धसमान कृती म्हणून संबोधले आहे. त्यामुळे बिलावल भुट्टोंच्या या वक्तव्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील आधीच तणावग्रस्त असलेल्या संबंधांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या प्रक्षोभक भाषणाचे पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत.