Tuesday, February 17, 2026 04:31:45 PM

Chhattisgarh Steel Plant Blast: छत्तीसगड हादरलं! स्टील प्लांटमध्ये भट्टीचा भीषण स्फोट; 6 कामगारांचा होरपळून मृत्यू, 10 हून अधिक जखमी

भाटापारा ग्रामीण भागातील बकुलाही गावात असलेल्या 'रिअल इस्पात अँड पॉवर लिमिटेड' या कारखान्यात ही दुर्घटना घडली. गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक कोळशाच्या भट्टीचा मोठा स्फोट झाला.

chhattisgarh steel plant blast छत्तीसगड हादरलं स्टील प्लांटमध्ये भट्टीचा भीषण स्फोट 6 कामगारांचा होरपळून मृत्यू 10 हून अधिक जखमी

Chhattisgarh Steel Plant Blast:  छत्तीसगडमधील बलोदा बाजार-भाटापारा जिल्ह्यात गुरुवारी एका स्टील कारखान्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथील एका स्टील प्लांटमधील कोळशाच्या भट्टीचा भीषण स्फोट होऊन 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

भाटापारा ग्रामीण भागातील बकुलाही गावात असलेल्या 'रिअल इस्पात अँड पॉवर लिमिटेड' या कारखान्यात ही दुर्घटना घडली. गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक कोळशाच्या भट्टीचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, आतील गरम कोळसा आणि कचरा थेट कामगार उभ्या असलेल्या प्लॅटफॉर्मवर सांडला. यामुळे कामगारांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

बचावकार्य आणि मृतांची संख्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक (SP) भावना गुप्ता आणि जिल्हा प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकृत माहितीनुसार, आतापर्यंत 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 10 जणांना बाहेर काढण्यात यश आले असून 4 जण गंभीररित्या भाजले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने बिलासपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

हेही वाचा - Traffic Index Survey : या शहरांमध्ये प्रवास म्हणजे 'डोकेदुखी'! देशात सर्वाधिक ट्रॅफिक असलेल्या 10 शहरांत पुणे 'या' स्थानी आणि मुंबई..

प्लांटमध्ये पसरली घबराट

दरम्यान, स्फोटानंतर परिसरात धूर आणि आगीचे लोट पसरले होते. गरम कोळशाच्या संपर्कात आल्याने अनेक कामगार गंभीर भाजले आहेत. "आम्ही 10 जणांना बाहेर काढले आहे, मात्र आत अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता असल्याने बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे," अशी माहिती एसपी भावना गुप्ता यांनी दिली.

सुरक्षा मानकांवर प्रश्नचिन्ह

या भीषण अपघातामुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील कोळसा भट्ट्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना केल्या जातात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, सुरक्षा मानकांचे पालन झाले होते की नाही, याचा तपास केला जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री