देशाची राजधानी नवी दिल्ली येथे संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट सुरक्षायंत्रणांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी रविवारी आठ संशयितांना अटक केली असून या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये काही परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांना संशयितांच्या हालचालींबाबत आधीच माहिती मिळाली होती. त्यानंतर राजधानीतील महत्त्वाच्या धार्मिक स्थळे आणि वारसा वास्तूंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आयईडीच्या माध्यमातून स्फोट घडवण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली होती.
या प्रकरणात काही संशयितांना तामिळनाडू मधून ताब्यात घेण्यात आले. देशातील विविध भागांत घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या एका मॉड्यूलचा शोध लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात काही संशयितांचा पाकिस्तानस्थित आयएसआयशी तसेच बांगलादेशातील काही कट्टर संघटनांशी संपर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.अटक केलेल्या व्यक्तींकडून अनेक मोबाईल फोन, सिम कार्ड आणि इतर डिजिटल साधने जप्त करण्यात आली आहेत. या साधनांच्या माध्यमातून त्यांचे नेटवर्क आणि संपर्क साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपास यंत्रणा विविध अँगलने चौकशी करत असून आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.