नवी दिल्ली: सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 च्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटात किमान 8 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सुमारे 7 अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटानंतर राजधानी दिल्लीमध्ये उच्च सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.
या घटनेने देशात पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवरील प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या दोन दशकांत भारताने अनेक भीषण दहशतवादी स्फोटांचा सामना केला आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबादपासून ते बोधगया आणि बंगळुरूपर्यंत देशातील अनेक ठिकाणी दहशतीची हे जाळे पसरले आहे. खाली भारतातील प्रमुख स्फोटांची एक कालरेषा (Timeline of Major Blasts in India) दिली आहे, जी देशाच्या सुरक्षेवरील आव्हानांची गंभीरता स्पष्ट करते.
भारतामधील मोठ्या स्फोटांची कालरेषा (Timeline of Major Blasts in India)
रामेश्वरम कॅफे स्फोट - 2024
1 मार्च 2024 रोजी बंगळुरूच्या ब्रूकफील्ड परिसरातील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला. या घटनेत 10 जण जखमी झाले. तपासात उघड झाले की, स्फोटासाठी Improvised Explosive Device (IED) चा वापर करण्यात आला होता.
भोपाळ - उज्जैन प्रवासी रेल्वे स्फोट 2017
मार्च 2017 मध्ये मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात भोपाळ - उज्जैन प्रवासी रेल्वेत स्फोट झाला. हा स्फोट सकाळी 9:30 ते 10:00 वाजण्याच्या दरम्यान सामान्य डब्यात झाला. स्फोटामुळे डब्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, धूर पसरला आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. रेल्वे त्वरित थांबवण्यात आली आणि प्रवाशांनी बाहेर पळ काढला.
हेही वाचा: Delhi Blast Update: फरीदाबाद टेरर नेटवर्कचा धागा लाल किल्ला स्फोटाशी; काश्मीरमधील अटकेत असलेल्या 'त्या' दोन डॉक्टरांची चौकशी सुरू
बोधगया स्फोट - 2013
7 जुलै 2013 रोजी बिहारमधील पवित्र बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगयातील महाबोधी मंदिर संकुलात सलग स्फोट झाले. या स्फोटांमध्ये दोन भिक्षू जखमी झाले. या प्रकरणात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आले. हैद्राबाद दुहेरी स्फोट - 2013 21 फेब्रुवारी 2013 रोजी हैद्राबाद येथील दिलसुखनगर भागात दोन स्फोट झाले. पहिल्या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आणि 131 जखमी झाले. काही सेकंदांनीच दुसरा स्फोट जवळच्या किराणा दुकानाजवळ झाला. हे दोन्ही प्रकरणे त्याच वर्षी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सुपूर्द करण्यात आली.
मुंबई तिहेरी स्फोट - 2011
13 जुलै 2011 रोजी मुंबईतील दादर, झवेरी बाजार आणि ओपेरा हाऊस या भागात सलग तीन स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आणि 100 हून अधिक जखमी झाले. या प्रकरणात इंडियन मुजाहिदीन या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या सदस्यांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले.
दिल्ली मालिकात्मक स्फोट - 2008
13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील करोल बाग, कनॉट प्लेस आणि ग्रेटर कैलाश या ठिकाणी सलग स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आणि 135 जखमी झाले. पोलिसांनी त्याच दिवशी तीन जिवंत बॉम्ब निष्क्रिय करून मोठी दुर्घटना टाळली.
मुंबई लोकल रेल्वे स्फोट - 2006
11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील सात लोकल रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट झाले. या स्फोटांत 189 जणांचा मृत्यू झाला आणि 824 जखमी झाले. स्फोट सायंकाळी 6:30 वाजता गर्दीच्या वेळेत झाले. स्फोटक पदार्थ प्रेशर कुकरमध्ये ठेवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र अँटी टेररिझम स्क्वॉडने (ATS) केला.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील हा स्फोट देशाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित करतो. देशात गेल्या दोन दशकांत अनेक दहशतवादी स्फोटांनी सुरक्षा यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे केले आहे. सध्या दिल्ली पोलिस, ATS आणि केंद्रीय तपास संस्था या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, स्फोटाचे मूळ कारण आणि जबाबदार घटकांविषयी लवकरच अधिक माहिती समोर येईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा: Red Fort blast: स्फोटाबाबत धक्कादायक माहिती समोर! अमित शाह म्हणाले 'संबंधित पुरावे...