Crime News: उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. केवळ आईस्क्रीमच्या पैशांच्या किरकोळ वादातून एका 52 वर्षीय नराधमाने एका तरुणाला अत्यंत क्रूरपणे संपवलं. एवढेच नव्हे, तर हत्येनंतर आरोपीने मृताचे शीर धडावेगळे करून ते चुलीत भाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, बेहटा येथील रहिवासी असलेला 26 वर्षीय तरुण बबलू राजभर आपल्या चुलत भावासोबत 'परसावल' गावात आईस्क्रीम विकण्यासाठी गेला होता. दुपारच्या सुमारास गावातील शंकर यादव नावाच्या व्यक्तीने बबलू कडून तीन आईस्क्रीम घेतले. मात्र, जेव्हा बबलूने या आईस्क्रीमचे पैसे मागितले, तेव्हा शंकरने वादावादी सुरू केली. रागाच्या भरात शंकरने घरातून विळा आणला आणि बबलूच्या मानेवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, बबलूचा जागीच मृत्यू झाला.
क्रूरतेचा कळस आणि अघोरी कृत्य
आरोपीचा संताप हत्येनंतरही शांत झाला नाही. त्याने मृत बबलूचे शीर धडावेगळे केले आणि ते घेऊन आपल्या घराकडे पळाला. ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या घरात धाव घेतली, तेव्हा तिथले दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. आरोपी शंकर यादव हा चक्क घरातील पेटत्या चुलीवर बबलूचे कापलेले शीर भाजत होता. पोलिसांनी जेव्हा त्याला याबाबत विचारले, तेव्हा "मी हे शीर शिजवून खाणार होतो," असे संतापजनक आणि धक्कादायक उत्तर त्याने दिले. हे ऐकून उपस्थित पोलीस अधिकारीही सुन्न झाले.
हेही वाचा - Ashok Kharat Scandal : धक्कादायक! उच्चपदस्थ महिला अधिकारी अशोक खरातच्या दरबारात लावयच्या हजेरी; पोलीस तपासात हादरवून टाकणारे खुलासे
पोलिसांची कारवाई आणि परिसरात दहशत
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आरोपी शंकर यादवला बेड्या ठोकल्या आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या अघोरी आणि अमानुष कृत्यामुळे संपूर्ण बाराबंकी जिल्ह्यात भीतीचे आणि तीव्र संतापाचे वातावरण आहे. केवळ काही रुपयांसाठी एका तरुणाचा असा अंत झाल्याने मानवी संवेदनांना मोठा धक्का बसला आहे.